सर्व प्रतिनिधींना विश्वासात घेवून विकास साधणार – अनिल पाटील

Team DGIPR Oct 17

नंदुरबार, दि. १७ (जिमाका) : जनता व सर्व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेवून जिल्ह्याचा समतोल विकास साधणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे मदत व पुनर्वसन,आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा पालकमंत्री अनिल पाटील यांनी केले आहे.

तळोदा येथे नगर परिषदेच्या वतीने आयोजित विविध विकास कामांच्या  भूमिपूजनप्रसंगी बोलत मंत्री श्री. पाटील बोलत होते. यावेळी माजी मंत्री व आमदार सर्वश्री जयकुमार रावल, राजेश पाडवी, शिरीषकुमार नाईक, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, धुळ्याचे माजी महापौर प्रदीप कर्पे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी नितीन कापडणीस व शहरातील पदाधिकारी, नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले की, मला या जिल्ह्याची सेवा करण्याची संधी मिळाली यामुळे मी स्वत:ला भाग्यशाली समजतो. राज्याचा मदत व पुनर्वसन,आपत्ती व्यवस्थापन विभागाचा मंत्री या नात्याने पुनर्वसनाचा एखादा प्रश्न प्रलंबित असेल, तेथे काही नागरी सुविधांची गरज असेल तर अथावा काही टप्पे बाकी असतील तर त्यास तात्काळ मंजूरी देण्याबरोबरच मदत व पुनर्वसनाच्या बाबतीत शेतकरी हा शासनाच्या अत्यंत जिव्हाळ्याचा व सर्वोच्च प्राथमिकचा विषय आहे. शेतकऱ्यांचे मदत पुनर्वसनाच्या प्रस्तावास एका दिवसात मंजूरी देण्याची ग्वाही देताना पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले की, जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून तळोदा नगरपालिकेला लोकसंख्येच्या निकषावर १०० टक्के निधी देण्यात येईल.

नगरपालिकेमध्ये काम करत असताना लागणाऱ्या निधीची तरतूद हा अत्यंत कळीचा विषय असतो. त्याचबरोबर नागरी सुविधांसाठी लागणारे मनुष्यबळ, वेतन, पेन्शन, पाणी, वीजबिल हे सुद्धा यक्षप्रश्न बनून उभे ठाकतात. आपल्या आराखड्यात सोलर प्रकल्पाची तरतूद नसेल तर ती आजच करून घ्या. आज जवळ-जवळ सुमारे ४० हजार लोकवस्तीच्या व सुमारे २०ते २२ हजार मतदारांच्या शहरासाठी आमदार राजेश पाडवी यांनी ७० कोटींचा निधी आणला, हे त्यांचे कौशल्य निश्चितच कौतुकास्पद व अभिनंदनास पात्र आहे.

पुनर्वसन वसाहतींच्या पायाभूत सुविधांसाठी पाठपुरावा करणार -आमदार राजेश पाडवी

तापी नदीवरून तळोदा शहराला शुद्ध पाणीपुरवठा व शहराची हद्दवाढ हे प्रश्न बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित होते. या भागाचा विधानसभा सदस्य झाल्यानंतर या योजनांचा पाठपुरावा केला व शासनाकडून त्यास तात्काळ मंजूरी घेवून निधीही उपलब्ध करून घेतला. नवीन हद्दवाढीत ज्या वसाहती व कॉलन्यांचा समावेश करण्यात आला आहे, त्यात रस्त्यांचे काँक्रीटीकरण व मुलभूत सुविधांचा समावेश आहे. ज्या वसाहती अजून हद्दवाढीत राहून गेल्या आहेत, त्यांचाही प्रस्ताव येणाऱ्या काळात सादर केला जाणार आहे. सुमारे ६० कोटी रूपयांचा नवीन हद्दवाढीचा प्रस्ताव सादर केला होता, त्यातील पहिला पहिल्या टप्प्यातील ३० कोटी रूपयांचा निधी मिळाला असून उर्वरीत ३० कोटींचा निधी मिळाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ज्या कॉलनी राहून गेल्या आहेत त्यांचादेखील विकास केला जाणार आहे. सरदार सरोवर प्रकल्पामुळे नर्मदाकाठावरील ज्यांचे स्थलांतर करण्यात आले त्या १४ वसाहतींपैकी १३ वसाहती तळोदा विधानसभा क्षेत्रात आहेत. या वसाहतींना  जो निधी प्राप्त झाला त्या निधीतून कामे चालू आहेत. पुनर्वसनातील जन सुविधेची कामे करण्यासाठी मदत व पुनर्वसन विभागाच्या माध्यमातून या वसाहतींमधील पायाभूत सुविधांसाठी निधीची तरतूद झाल्यास मोठ्या प्रमाणावर सोयी-सुविधा उपलब्ध करून देता येतील, त्यासाठी येणाऱ्या काळात आपण पाठपुरावा करणार असल्याचेही यावेळी आमदार राजेश पाडवी यांनी मनोगत व्यक्त कराताना सांगितले.

यावेळी आमदार जयकुमार रावल, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, प्रदीप कर्पे यांनीही मनोगत व्यक्त केले.

या कामांचे झाले भूमिपूजन

◼ तळोदा नगरपालिकेचे अमृत २.० तापी पाणी पुरवठा योजना (रूपये ३० कोटी)

◼ सरस्वती तुकाराम नगर मिराकाशी नगर अंतर्गत रस्ते व गटारी तयार करणे.

◼सुशीला श्रीराम नगर अंतर्गत रस्ते व गटारी तयार करणे.

◼गरीब नवाज कॉलनी आणि काशीराम नगर आणि रविहस नगर अंतर्गत रस्ते व गटारी तयार

करणे.

◼ रामकृष्ण नगर अंतर्गत रस्ते व गटारी तयार करणे.

◼विठ्ठलवाडी आणि पुंडलीक नगर अंतर्गत रस्ते व गटारी तयार करणे.

◼पार्वतीपुर नगर अंतर्गत रस्ते व गटारी तयार करणे.

◼मिरानगर अंतर्गत रस्ते व गटारी तयार करणे.

◼ लालजीनगर अंतर्गत रस्ते व गटारी तयार करणे.

◼ कृष्णशोभा विहार आणि गोविंद नगर आणि रूपानगर अंतर्गत रस्ते व गटारी तयार करणे.

◼ भारती क्षात्रय नगर अंतर्गत रस्ते व गटारी तयार करणे.

◼ इंद्रप्रस्थ नगर, श्रीराम नगर आणि चाणक्यपुरी नगर अंतर्गत रस्ते व गटारी तयार करणे.

(सर्व अंतर्गत रस्ते व गटारींची कामे रूपये २४ करोड)

०००

Agroindia Writer
Agroindia Writer
Articles: 55

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *